नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये आज सायंकाळच्या सुमारस धुव्वाधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटाट नाशिककरांनी ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव घेतला....
या आठवड्यात वाढलेल्या उष्णतेमुळे नाशिककर हैराण झाले होते. अखेर आज सायंकाळी बरसलेल्या जलधारांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु आहेत.
त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नसली तरीदेखील बंदोबस्तावर असलेले पोलीस, मेडिकल, हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफची आज सायंकाळच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.
नाशिककरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगवेगळे पावसाचे फोटो स्टेटस ठेवत अचानक आलेल्या पावसाचा आनंद लुटला.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे नुकसान
नाशिक शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या उन्हाळ कांदा काढण्याची शेतकऱ्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे आज अचानक आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा पावसात भिजला. कालदेखील नाशिकच्या अनेक भागात गारपिट झाली होती. त्यामुळे कालही मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे.