
देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे (Prerna Balkwade, District President, Nationalist Women's Congress) यांच्या संकल्पनेतून भगूर शहरात विधवा महिलांसोबत वटपौर्णिमा (Vatpoornima with widows)साजरी करण्यात आली.
भगूर शहरात विधवा महिलांचा हळद-कुंकू लावून, साडीचोळीने सन्मान करून त्यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन बलकवडे यांनी केले.
यावेळी जिजाबाई जाधव, अर्चना पारचा, प्रियंका शेलार, सुलोचना मोरे, अनिता गोडसे, मंदाबाई गायकवाड, संगीता कोळेकर, सिंधुबाई इंगळे यांच्यासह दोनशेहून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बलकवडे यांनी सांगितले की, रूढी परंपरेनुसार नवरा गेल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे, सर्व शुभकार्यातून लांब ठेवणे या गोष्टी केल्या जातात.
फक्त एक व्यक्ती गेली म्हणून स्त्रीला असे समाजात बाजूला पाडणे हे चुकीचे आहे. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाने सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा हा शब्दच अपमानास्पद व बंधनांनी घेरलेला असून तो बदलून एकल महिला असे आजपासून म्हणावे.
भगूर शहरात ज्या एकल महिलांना कुटुंबात आधार नाही व मुले लहान आहेत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झेप फाऊंडेशनच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करुन मोफत फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण येत्या महिन्यात देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास वर्षा लिंगायत, पुष्पलता उदावंत प्रेमा राजगुरु, कांचन दळवी, अनुराधा दिवटे, किरण जाधव, शितल बलकवडे, ज्योती भागवत, नीता शिंदे, संगिता झांजरे, विजया लिलके आदी महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन नीलम शिरसाठ तर सायरा शेख यांनी आभार मानले.