इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar
पाथर्डी फाटा ( Pathardi Phata )परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहेत. त्याचा उग्र वास व त्यापासून निर्माण झालेले रस्त्याचे खड्डे यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो आहे. याच्या विरोधात आआपाने ( Aam Aadmi Party )नाकाला चिमटा लावून अनोखे आंदोलन केले.
पाथर्डी फाटा परिसरात आर. के. लॉन्स, चांगलचुंगल हॉटेलसमोर मागील दीड ते दोन महिन्यापासून गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहेत. गटारीचे पाणी हे सरळ पावसाच्या वाहणार्या पाण्यात सोडण्यात आले आहे. यामुळे नीळकंठ, कृष्णा प्राइड, अक्षदा हाईट या इमारती तसेच रेणुका मोटर येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊनसुद्धा ही समस्या मार्गी लागत नव्हती. दुर्गंधीमुळे रोगाचे साम्राज्य पसरत आहे. वास इतका उग्र आहे की चालणे व राहणेसुद्धा मुश्किल झाले आहे.
आआपाच्या कार्यकर्त्यांनी तुषार जाधव, वैभव पाटील व इतर नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी आपली तक्रार आपकडे मांडली. यावेळी आआपचे नेते जितेंद्र भावे, आशिष खंडीझोड, दिनकर पवार, बापू अहिरे, प्रतीक पवार, आणि इतर सहकार्यांसह, नाकाला चिमटा लावून आणि रस्त्याला श्रद्धांजली देऊननिषेध केला.
ज्या ठिकाणी हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून त्या इमारतींच्या समोर जाते, त्या ठिकाणी माजी नगरसेवक, भाजपच्या पदाधिकार्यांचे संपर्क कार्यालयही आहे. या इच्छुक असलेल्या उमेदवारांना व पदाधिकार्यांना याचा वास व दुर्गंधी येत नाही का? जे स्वतःच्या ऑफिसमोरीलच दुर्गंधीयुक्त पाणी दिसत असूनही काहीही हालचाल करीत नाहीत ते रहिवाशांच्या समस्या सोडवतील का? अशा चर्चा सध्या होत आहेत. प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.