माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जि. प.सेवकांनी घेतली हरित शपथ

नववर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जि. प.सेवकांनी घेतली हरित शपथ

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सेवकांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामुहिक हरित शपथ घेत पर्यावरण संवर्धनासाठी व्यक्तिगत स्तरावर कृतिशील प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात सकाळी सर्व सेवक एकत्र येत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात केली.

पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सेवकांना हरित शपथ दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी या प्रसंगी सर्व सेवकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देत येत्या वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या सेवकांना मार्गदर्शन करतांना माझी वसुंधरा हे अभियान प्रत्येकाशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक सेवकाने या अभियानात सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावे.

कार्यालयात येतांना सायकलचा वापर करावा, घरी बायोगॅस संयंत्राचा वापर करावा त्याच बरोबर सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करून या अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा.

या अभियानास पूरक अशी कृती करणाऱ्या प्रत्येक सेवकाचे नाव आणि त्यांच्यावतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेला प्रयत्नांची माहिती ही जिल्हा परिषदेच्या समाजमाध्यमावर प्रसारित करून माझी वसुंधरा अभियानाच्या विशेष फलकावर लावण्यात येईल. जेने करून इतर सेवकांना देखील त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल, असे सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका उज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे (आस्थापना), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा जलसंधारण अधिकारी (लपा. पूर्व) मंगेश खैरनार, कार्यकारी अभियंता इवद दादाजी गांगुर्डे, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अशी घेतली शपथ...

"मी शपथ घेतो/घेते की भारताचा सुजाण नागरिक या नात्याने स्वच्छ सुंदर सुजलाम सुफलाम् भारत घडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील. विविध प्रकारची वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करेल, हरित भारताचे स्वप्न पूर्ण करेल.

धूर मुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करिन, घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेल. भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने कमीत कमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वासमोर ठेवीन.

जमिनीचा स्टार उंचावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणार नाही, त्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये हिरहिरीने भाग घेईन. पृथ्वीच्या रक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी अंगिकारण्यास मी कटिबद्ध असेन."

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com