<p><strong>नाशिक | Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>दहावी, बारावीसह राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कधी, कशा होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.</p>.<p>विविध अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षांची वेळापत्रके दरवर्षी डिसेंबपर्यंत जाहीर होतात. यंदा अद्यापही कोणत्याही परीक्षांबाबत स्पष्टता नाही.</p><p>फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या राज्यमंडळाच्या परीक्षा यंदा मे-जूनमध्ये घेण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाची चाचपणी सुरू आहे. आयआयटीसह विविध राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील सामायिक परीक्षा (जेईई) दोन वेळा घेण्यात येते.</p><p>त्यातील पहिली परीक्षा जानेवारीत होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा मे महिन्यात होते. या परीक्षा होणार का, पुढे ढकलण्यात येणार का, याबाबतही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा कक्षाने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.</p><p>राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यंदाच्या तुकडीची प्रवेश प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षानेही पुढील परीक्षांबाबत निर्णय जाहीर केलेला नाही.</p>.<p><em><strong>ढाेबळ रूपरेषा तरी जाहीर करा</strong></em></p><p><em>प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या की त्यानुसार विद्यार्थी नियोजन करतात. अनेक विद्यार्थी एकापेक्षा अधिक परीक्षा देतात. त्यामुळे कोणती परीक्षा कधी होणार आहे याचे नियोजन विद्यार्थी करतात.</em></p><p><em>‘शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या प्रत्यक्ष सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात राहून अभ्यास करत आहेत. ऑनलाइन वर्गही सुरू आहेत.</em></p><p><em>त्यामुळे परीक्षा कधी होणार याची ढोबळ रूपरेखा तरी राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाने आता जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी नियोजन करू शकतील, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.</em></p>