
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे शंभर एकर जागेवर आयटी हब उभारले जाणार आहे. पायाभूत सुविधांसह आयटी पार्क तयार झाल्यास, आयटी पॉलिसीमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या नाशिकला उपयुक्त ठरतील. नाशिकमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी सध्या आम्ही चर्चा करीत आहोत. ट्रक टर्मिनलबाबत देखील आमचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा की एमआयडीसीने हे ठरवून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली...
नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी सामंत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, गेल्या अधिवेशनात मैत्रीसारखा कायदा आणल्याने परवानग्या सुलभ होणार आहे. असेच राज्यातील लघु उद्योगांना सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या इन्सेन्टीव्हचे वाटप करण्यात आले आहे. नाशिकमध्ये नवे उद्योग आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असले तरी, उद्योजकांनी यास समर्थता दर्शविणे आवश्यक आहे. उद्योगमंत्री म्हणून नवे उद्योग आणणे माझ्या हाती आहे. मात्र आपला उद्योग कुठे उभारायचा याचा सर्वस्वी अधिकार उद्योजकांचा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्र्यंबकेश्वर रोडवरील खादीग्राम सेंटरच्या २६२ एकर जागेपैकी ५० एकर जागा एक्झिबिशन सेंटरसाठी उपलब्ध करून यावी, यासाठी खासदार गोडसे यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. ही जागा पुढील दोन ते तीन महिन्यात ताब्यात घेतली जाईल. तसेच पांजरापोळसाठी नेमलेल्या समिती सदस्यांमधील आयुक्तांची बदली झाल्याने, नव्या आयुक्तांना समितीत सहभागी करून घेतले जाईल. जुना आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला असून, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी आहे.
इंडिया बुल्सची सोळाशे एकर जागा त्यांच्याकडून परत घेतली जाणार असून, एमआयडीसीकडे सुपूर्द केली जाईल. याचा फायदा मोठ्या उद्योगांसह, लघु उद्योगांना होणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी अक्राळे येथे जागा दिली जाणार आहे. एमआयडीसीतील मोठ्या भूखंडांचे तुकडे पाडणाऱ्या खासगी विकासकांना लगाम लावण्यासाठी एनसीएलटीच्या माध्यमातून केंद्राला पत्र पाठविणार असल्याचेही यावेळी मंत्री सामंत म्हणाले.