मनमाड । प्रतिनिधी Manmad
ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक उलटून कार व दुचाकीवर जाऊन धडकल्याने अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले तर कारमधील पाच जण दैवबलवत्तर म्हणून बचावले. उलटलेल्या ट्रकखाली दबले गेल्याने दुचाकी व कारचा चक्काचूर झाला. पुणे-इंदोर महामार्गावर बेथेल चर्चसमोर ही घटना घडली.
या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गाची झालेली दुरवस्था तसेच स्पीड ब्रेकरवर नसलेले पांढरे पट्टे आदींमुळे येथे रोज अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर बांधकाम विभाग खड्डे बुजवून स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे रंगवेल असा प्रश्न संतप्त नागरीकांतर्फे विचारला जात आहे.
पुणे येथून एमएच-09,जीएच-5453 हा ट्रक इंदोर कडे जात असताना बेथेल चर्च समोरील स्पीड ब्रेकर चालकाला दिसून आला नाही त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून तो एमएच-41,एएम- 1835 या कार सोबत एमएच-41,पी-349 या मोटारसायकलवर उलटल्याने त्या दबल्या जावून दुचाकीवरील प्रवीण सूर्यवंशी आणि रविंद्र गोडसे हे तरूण जागीच ठार झाले.
पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, निरीक्षक गीते यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करत त्यास पोलिसांनी अटक केली आहे.