
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निसर्गाचा (Nature) समतोल राखला तरच निरामय आरोग्य लाभेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) यांनी केले....
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत विद्यापीठ परिसरात कुलगुरु कानिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला (Tree Plantation campaign) प्रारंभ करण्यात आला.
महाविद्यालयातील 750 विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. सुबोध मुळगुंद, डॉ. सुशीलकुमार ओझा, डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चव्हाण यांनी सांगितले की, वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांनी परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करावे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांना जिओटॅग करण्यात येणार असून त्या वृक्षाचे औषधी उपयोग, छायाचित्र व माहिती स्मार्ट मोबाईलने क्युआरकोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवड (Tree planting) करताना विशिष्ट पध्दतीने वर्गीकरण करण्यात आले असून यामध्ये रुची उद्यान, गंध उद्यान, श्रवण उद्यान, दृष्टी उद्यान व स्पर्श उद्यान असे भाग तयार करण्यात आले आहेत.
विद्यापीठात आयोजित वृक्षरोपणासाठी नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, गोखले नर्सिंग कॉलेज, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ नर्सिंग, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, भोसला नर्सिंग कॉलेज, आयुर्वेद सेवा संघ संचलित आयुर्वेद महाविद्यालय, धन्वंतरी होमिओपॅथी कॉलेज, सप्तऋृंगी आयुर्वेद महाविद्यालय, साई केअर कॉलेज ऑफ नर्सिंग,
के.बी.एच. दंत महाविद्यालय आदी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व सुमारे 750 विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.