
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कांदा (Onion) बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून ती थांबविण्यासाठी शासन स्तरावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ थोरे (Pandharinath Thore) यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे...
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या ह्या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी लासलगांव व पिंपळगांव बसवंत बाजार समिती आशिया खंडात प्रसिध्द बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकूण आवकेपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांदा या शेतीमालाची असते.
सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातुन विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी ७० ते ८० टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो.
महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असून महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा २९ टक्के वाटा आहे.
सद्यस्थितीत लासलगांव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज साधारणतः ४५ ते ५० हजार क्विंटल लाल (लेट खरीप) कांद्याची कमीत कमी ४०० रुपये, जास्तीत जास्त १,२९७ रुपये व सर्वसाधारण ७८० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत कांद्याच्या सर्वसाधारण भावात ४५० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने घट झालेली आहे.
यंदा महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत असुन दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे.
कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्यास केंद्र व राज्य शासनाच्या ध्येय-धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन कोणत्याही क्षणी त्यांच्याकडून कांदा लिलावाचे कामकाज बंद पासून रस्ता रोको किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे..