वासोळ । वार्ताहर Vasol
करोना उद्रेकाचा फटका यंदा वृक्षारोपण उपक्रमास देखील बसला आहे. प्रशासनासह नागरीकांनी वृक्ष लागवड अद्याप सुरू न केल्याने वृक्षप्रेमींमध्ये निराशेचे सावट पसरले आहे. पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड व संगोपन काळाची गरज आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळत वृक्ष लागवड अभियान त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून त्याचे दुष्परिणाम वाढत आहे. तोडण्यात आलेल्या वृक्षाच्या प्रमाणात मात्र वृक्ष लागवड केली जात नाही. त्यामुळे निसर्ग चक्र विस्कळीत झाले आहे. करोना उद्रेकामुळे राज्य शासन आर्थिक संकटात असल्याने वृक्ष लागवड अभियान यंदा राबविले जाणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
शासन, प्रशासन अडचणीत असले तरी नेहमी वृक्षारोपण मोहिम राबविण्यात अग्रेसर राहणारे वृक्षप्रेमी शासकिय कार्यालयातील अधिकारी, शाळा-महाविद्यालय, संघटना या सुध्दा यावर्षी वृक्षारोपणासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. जुलै महिना संपला आहे. परंतु आजही पाहिजे त्याप्रमाणात झाडे लावण्यात आली नाही. काळाची गरज व पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शक्य होईल त्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करावे, अशी अपेक्षा वृक्षप्रेमींतर्फे केली जात आहे.