नाशिक । प्रतिनिधी Nashik
कांदा निर्यातबंदीमुळे हजारो शेतक-यांची घरे उध्वस्त झाली आहेत.
हा प्रश्न घेऊन आम्ही अतिशय संवेदनशील असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जाणार आहोत.अभिनेत्री कंगना रानावत यांचे अनधिकृत बांधकाम पाडल्यावर लगेचच भेट दिली. त्यामुळे आम्हीही शुक्रवारी (दि.१८) राज्यपालांची भेट घेणार आहोत, असे शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले.
शुक्रवारी नाशिकचे विविध शेतकरी आणि आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत. त्यांनी कांदा निर्यातबंदी निर्णयासंदर्भात हस्तक्षेप करुन राज्यातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा,अशी आम्ही विनंती करणार आहे.
अभिनेत्री कंगना रानावतला राज्यपाल भेटले. राजकीय कार्यकर्त्यांनी मारहान केलेल्या निवृत्त अधिकारी शर्मा यांना देखील त्यांनी लागलीच भेट दिली. त्यामुळे आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कांदा निर्यातबंदी झाल्याने हजारो शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. विविध प्रकारे न्याय मिळावा म्हणून मागणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेणार असल्याचे वडघुले यांनी सांगितले.
दरम्यान वडघुले यांना राज्यपालांनी अद्याप भेटीची परवानगी दिलेली नाही. त्यासाठी त्यांनी विनंती पत्र पाठविले आहे. तसेच हे शिष्टमंडळ भेटीसाठी राजभवनाशी संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
...