<p><strong>नाशिक । Nashik (विजय गिते)</strong></p><p>भारतातील ८० टक्के द्राक्षे निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे ३०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात अधिक झाली असली तरी युरोपातील निर्यात मात्र दीड हजार टनांनी कमी झाली आहे.</p>.<p>यातही जमेची बाजू पाहता बिगर युरोपीय देशांमध्ये मात्र निर्यात वाढलेली आहे. यामुळे यंदाच्या निर्यातीला हातभार लागला खरा. परंतु, युरोपातील कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे असलेल्या निर्बंधांचा निर्यातील फटका बसत असल्याचे चित्र आहे.</p><p>नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे देशातील प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हा. देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी ८१ टक्के निर्यात महाराष्ट्रात व त्याच्या ९१ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्हयातून होत असते. त्यामुळे नाशिक जिल्हयात ॲपेडाने ठरवून दिलेल्या मानकांचे पालन करून निर्यात करण्याची एक व्यवस्था विकसित झाली आहे.</p>.<p>त्यानुसार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ऑनलाईन पद्धतीने बागांची नोंदणी करणे, ग्रेपनेट प्रणालीचा अवलंब करणे ही नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी सामान्य बाब आहे. दरवर्षी युरोप व बिगर युरोपीय देशांमध्ये नाशिकमधून मोठ्याप्रमाणावर द्राक्ष निर्यात होते. सन २०१८-१९ या वर्षात नाशिकमधून १४६११३ मेट्रिक टन, तर २०१९-२० मध्ये १२६१७२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यावर्षी १ मार्चपर्यंत जिल्हयातून ६२४७६ मेट्रिक टन निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातील हंगाम आणखी दोन महिने सुरू राहणार आहे.</p><p>निर्यातीसाठी बागांची नोंदणीही यंदा मागील वर्षाच्या तुलनेत साडेचार हजार हेक्टरने अधिक आहे. यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक निर्यात होईल, असा अंदाज आहे. मात्र, युरोपमध्ये यंदा कोव्हिड १९ चा उद्रेक वाढला असल्याने तेथील सुपर मार्केटमध्ये जाण्याबाबत ग्राहकांवर मर्यादा आल्या असल्याने तेथून मागणी कमी आहे. यामुळे मागील वर्षी १ मार्चपर्यंत ४४८४० मेट्रिक टन द्राक्ष युरोपात निर्यात झाले असताना यंदा ही निर्यात ४३२१० मेट्रिक टन आहे.</p>.<p><strong>एक मार्चपर्यंत द्राक्ष निर्यात</strong><br><br><strong>वर्ष युरोप बिगर युरोप</strong><br><br>२०२० ४४८४० १७१९१<br><br>२०२१ ४३२१० १९२६६</p>.<p>राज्यातून ३६ हजार द्राक्ष बागांची नोंदणी<br><br>भारतीय फळे व भाजीपाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.त्यामुळे परदेशातील फळे,भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतातून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून हा आलेख वाढतच चालला आहे.महाराष्ट्रातून तब्बल ३५ हजार ७०० द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे.तर देशभरातून ६४ हजार ४१८ बागांची नोंदणी झालेली आहे.<br></p><p>यावर्षी राज्यातून अधिकाधिक निर्यातीस चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना दिलेला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे, आंबा, डाळिंब, संत्रा व भाजीपाला पिकांची नोंदणी हॉर्टिनेट प्रणालीवर फार्म रजिस्ट्रेशन या मोबाईल अॅपद्वारे करण्यास सुरूवात केली आहे. परदेशातून शेतीमालाला मोठी मागणी आहे. त्यासाठी शेतीमाल रेसिड्यू फ्री असणे आवश्यक आहे. मागणीची पूर्तता करण्याकरिता मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.<br></p><p>देशात कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कृषी विभागात जाण्यायेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. त्या अडचणी येऊ नये म्हणून फलोत्पादन विभागाने ‘अपेडा’मार्फत `फार्म रजिस्ट्रेशन` कनेक्ट मोबाईल अॅपद्वारे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी राज्य पातळीवर वेबिनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे शक्य झाले.</p>.<p><strong>द्राक्ष बागांची नोंदणी राज्यनिहाय</strong><br></p><p><em><strong>राज्य एकूण</strong><br>महाराष्ट्र ४६,४७०<br>कर्नाटक १०,३९५<br>गुजरात २६८५<br>आंध्र प्रदेश २४६८<br>उत्तर प्रदेश ६५७<br>तमिळनाडू ७०<br>केरळ ११३<br>तेलंगाणा १४४१</em></p>.<p><strong>द्राक्ष हंगामाचे गणित बिघडवले<br></strong><br>जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीत द्राक्ष पिकाचा मोठा वाटा आहे. या पिकामुळे अनेक व्यावसायिक संधीही निर्माण झाल्या. यातून अनेकांच्या जीवनमानात मोठा बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रयोगशिलतेने अनेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र चालू वर्षी ऐन हंगामात निर्यात प्रक्रिया लॉकडाउनच्या फटक्यात सापडल्याने अडचणी वाढत गेल्या. त्यामुळे कोलमडलेल्या निर्यात प्रक्रियेने द्राक्ष हंगामाचे गणित सलग दुसऱ्या हंगामातही काही प्रमाणात बिघडवले आहे.<br></p><p>राज्यातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी नाशिकचा वाटा ९१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्र ५८ हजार ३६७.४३ हेक्टर क्षेत्र आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्यातक्षम माल पिकविला. सुरुवातीला मागणी असल्याने दरातील तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतोषाचे वातावरण होते. अनेक निर्यातदार स्पर्धेत असल्याने शेतकऱ्यांशी सौदे झाले होते.</p><p>मात्र, हंगाम ऐन मोसमात असताना मार्चअखेर लॉकडाउन झाल्याने निर्यात प्रक्रिया अडचणीत सापडली. सुरुवातीला निर्यातदारांना कामकाजासाठी मार्गदर्शक सूचना नसल्याने सगळीकडे संभ्रम होता.अशीच काहीशी परिस्थिती यावर्षीच्या हंगामातही राहिली. हंगामात देखील मजूरटंचाई, वाहतूक, आवश्यक पॅकिंग साहित्य या अडचणी आल्या.</p>.<p>नाशिकमधून झालेली निर्यात (टनांत)<br>बाजारपेठ २०१८-१९ २०१९-२० तफावत<br>युरोपियन देश १,११,६४७ ८१,९७८ २९,६६९<br>नॉन युरोपियन देश ३४,४६६ २९,८३३ ४,६३३</p>.<p><strong>उत्पादकांसमोरील अडचणी</strong></p><p>निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून या अडचणींमध्ये वाढच होत आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादकांना नेहमीच फटका बसत आलेला आहे. यातून काही मार्ग निघेल का या चिंतेत असताना आता निर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे.</p><p>यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर चिंतेचे वातावरण आहे. द्राक्ष हंगाम सुरू होताच केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.निर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे एक लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.याबरोबरच कंटेनरच्या भाड्यामध्येही दोन लाख रुपयांनी वाढ झाल्याने एकूण तीन लाख पन्नास हजारांचा फटका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे.</p>.<p><strong>तफावतीचा फटका</strong></p><p>अलीकडच्या काळात द्राक्ष पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढले आहे राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या नोंदीनुसार देशात 1 लाख 40 हजार हेक्टर द्राक्ष बागांचे लागवड झालेली आहे. तर राज्य फलोत्पादन विभागाने महाराष्ट्रात एक लाख दहा हजार हेक्टरवर लागवड असल्याचे सांगितले आहे.</p><p>मात्र, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये जवळपास पाच लाख दहा हजार हेक्टर तर राज्यामध्ये दोन लाख हेक्टर द्राक्ष बागांची लागवड झालेली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे पिकाची नेमकी किती लागवड झालेली आहे.याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.त्यामुळे पिकांची लागवड विक्री याविषयी निर्णय घेता येत नाही.परिणामी बाजारामध्ये अंदाजापेक्षा अचानक आवक वाढते आणि माल मातीमोल दराने विकला जातो.</p>.<p><strong>द्राक्ष महोत्सव प्रेरणादायी</strong></p><p>द्राक्षाची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांकडे दर्जेदार द्राक्ष असूनही कोविड-१९ मुळे मागील वर्षी युरोपात द्राक्ष निर्यात होऊ शकलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून राज्यातील ग्राहकांना नाशिकची निर्यातक्षम द्राक्ष सहज घरपोच उपलब्ध व्हावीत, यासाठी ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस आणि गिरणारे येथील ' आपला मळा ' या शेतकरी गटाने द्राक्ष महोत्सवाचा उपक्रम सुरू केला आहे. तो प्रेरणादायी असून ग्राहकांच्या या महोत्सवाला प्रतिसाद लाभत आहे.</p>.<div><blockquote>द्राक्ष पीक कर्जाचा विमा काढावा : द्राक्ष पिकासाठी जिल्हा बँकांमार्फत कर्ज दिले जाते.या पीक कर्जावरच विमा काढणे गरजेचे आहे. अनेक वेळा द्राक्ष बागांना नैसर्गिक फटका बसतो. यातून शेतकरी उध्वस्त होतो.अशा वेळी जर पीक कर्जावरच विमा काढलेला असेल तर नैसर्गिक आपत्ती आलेल्या द्राक्ष उत्पादकांना विम्याची रक्कम मिळू शकते. त्यामुळे द्राक्ष पीक कर्जाचा विमा जिल्हा बॅँकेने काढावा.</blockquote><span class="attribution">संजय बनकर, कृषी सभापती (जिल्हा परिषद)</span></div>.<div><blockquote>मागणी असूनही भाव अल्प : गतवर्षी कोविड -१९ मुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.खत बी बियानाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.अशा परिस्थितीत द्राक्षाला २०-२५ रुपये किलो भाव मिळत आहे. मागणी असूनही भाव अल्प का? याचा शोध घेणे आवश्यक असून यामागे खरेदीदारांची मोनोपॉली तर नाही ना?</blockquote><span class="attribution">प्रमोद माळी, शेतकरी</span></div>