<p><strong>नाशिक । प्रतिनिधी Nashik</strong></p><p>लॉकडाऊमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षासमोर अनेक अडचणी उभ्या केल्या. विद्यार्थी संपूर्ण वर्ष ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. म्हणूनच एससीईआरटीने यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. </p>.<p>दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहेत. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 426 तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.</p><p>मुंबईमध्ये सर्वाधिक 83 समुपदेशकांची नियुक्ती केली असून, त्याखालोखाल पुणे 46, ठाणे 30, कोल्हापूर 26, रत्नागिरी 25, सातारा 20, नाशिक 18, अहमदनगर 13, रायगड 12, औरंगाबाद 12, अमरावती 11, नागपूर 8 असे सर्व जिल्ह्यांमध्ये समुपदेशक नेमले आहेत. या समुपदेशकांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.</p><p><em><strong>दहावीच्या अर्जांसाठी मुदतवाढ</strong></em></p><p>2021 मध्ये घेण्यात येणार्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार विद्यार्थांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. मंडळाने 2 फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतीत विद्यार्थांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. मात्र त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाईल. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 3 ते 13 फेब्रुवारीपर्यंत आहे. नियमित विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी, श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी www.mahahsscboard.in वेबसाइटवर परीक्षा अर्ज भरू शकतात</p>