नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon
येथील एसटी (ST Bus) आगारातील बहुसंख्य बसेस खराब व नादुरस्त झालेल्या असून त्या कुठेही बंद पडतात. काही बसेस गळक्या असून पाऊस (rain) सुरू असतांना त्या पुर्णपणे गळतात.
यामुळे प्रवाशांचे हाल करणार्या अशा कालबाह्य बसेस तात्काळ सेवेतून काढून टाकाव्यात, अशी मागणी मनसेचे (MNS) तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात (Taluka President Pradeep Thorat) यांनी केली आहे. नांदगाव (nandgaon) आगारातील कालबाह्य झालेल्या बसेस त्वरीत काढण्यात याव्यात या संदर्भात आगार प्रमुख विश्वास गावीत यांना मनसेनेतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन (memorandum) देत त्यांचे लक्ष वेधले.
नांदगाव एसटी आगारातील बहुसंख्य बसेस या खराब व नादुरस्त असल्याचा फटका या बसेसमधून प्रवास करणार्या नागरीकांना विशेषत: महिला व विद्यार्थ्यांना (students) बसू लागला आहे. मशीन कालबाह्य झाल्यामुळे कुठेही नादुरूस्त होवून बस बंद पडत असल्याने ती जागेवरच उभी करावी लागते. त्यामुळे या बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांना दुसरी बस येण्याची वाट पहावी लागते किंवा मिळेल त्या वाहनातून पुढे मार्गस्थ व्हावे लागते.
यामुळे आर्थिक बरोबर वेळेचेही नुकसान प्रवाशांचे होत आहे. रात्रीच्या वेळेस बस बंद पडल्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने कालबाह्य बसेस तात्काळ सेवेतून काढण्यात याव्यात. व्यवस्थित तपासणी करूनच बसेस आगारातून बाहेर काढाव्यात. बस रस्त्यात बंद पडणे किंवा धक्का देण्याची वेळ प्रवाशांवर येता कामा नये. यापूर्वीच्या काही बसफेर्या बंद असून त्या पुर्ववत वेळेनुसार सुरू कराव्यात.
लांबपल्यासाठी नवीन बस असाव्यात. पासधारक विद्यार्थ्यांचे हाल होतात. चेंगराचेंगरी होते. शक्य असल्यास जादा बसेस देण्याचे करावे. बसेसवर फलक व्यवस्थितपणे लावावेत. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात (memorandum) देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, सचिव अभिषेक विधे, मयूर खरोटे, मयूर कुलकर्णी, लकी खैरे, बळीराम सदगीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.