
नाशिक | Nashik
राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतीराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी दिली...
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (Divisional Commissioner's Office, Nashik) येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण (Flag Hoisting) ग्रामविकास व पंचायतीराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी महाजन बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप,नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशासह महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक मध्येही क्रांतीकारक घडना घडल्या. स्वातंत्र्य संग्रामात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) वीरांची भूमिका महत्वाची आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहे. त्याचप्रमाणे येवला येथील जन्मभूमी असलेले तात्या टोपे, कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या सारख्या जिल्ह्यातील ज्ञात व अज्ञात असलेल्या क्रांतिकारांचे बलिदान आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात साधारण ११ लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये अनुकंपा तत्वावर पाचशे पेक्षा अधिक उमेदवारांना शासकीय सेवेत समावेश करून नियुक्ती पत्रे देण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
तसेच पुढे ते म्हणाले की , कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारी विषयी जागरूकता निर्माण करण्याकरीता 'सायबर दूत' संकल्पना पोलीस यंत्रणा राबवित आहे. या अंतर्गत १०१४ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करण्याऱ्या योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीच्या इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील निवडक विद्यार्थ्यांना नियमीत अभ्यासक्रमासोबत सीईटी, जेईई या व्यवसायिक प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी 'सुपर फिफ्टी' नाविन्यपूर्ण उपक्रम राविबण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून यावर्षी पन्नास ऐवजी १०० विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमात करण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.