नाशिक | Nashik (प्रतिनिधी)
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. ३० जूनपर्यंत ५० वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या अधिकारी, कर्मचारी या योजनेस स्वेच्छा पात्र राहणार आहे. यातून एसटी महामंडळाची महिन्याला १०० कोटींची बचत होणार असल्याचे समजते.
करोनाच्या महामारीमुळे तब्बल ८ महिने एसटीची सेवा बंदच असल्याने एसटीची तिजोरी रिकामी झाली. त्यातच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला असून, शासनाच्या विशेष आर्थिक पॅकेजवर एसटीचा डोलारा सध्या सुरू आहे.
एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एसटीवर बोझा पडत असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे.
या योजनेमुळे सुमारे २७ हजार कर्मचारी, अधिकारी सध्या पात्र ठरत असून, १ जुलै ते ३१ डिसेंबर पर्यंत ५० वर्ष वय होणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांबद्दल एसटी संचालक मंडळाच्या पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे महामंडळाने सांगितले आहे.
योजनेचा असा लाभ मिळणार
सेवानिवृत्तीप्रमाणे देय असलेले भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजा रोखीकरण इत्यादीचे लाभ मिळणार सेवानिवृत्तीनंतर स्वीकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास १५ दिवसात त्याचा निपटारा केला जाईल. स्वेच्छासेवानिवृत्ती नंतर मोफत कौटुंबिक पास देण्याची योजना लागू राहील.