<p><strong>सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)</strong></p><p>थेट शेतकरी ते ग्राहक बाजारतळ ही पुणे, मुंबई सारख्या शहरांत राबविली जाणारी संकल्पना नाशिक जिल्ह्यात प्रथमच सोमठाणे गावात राबविली जात असून त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आ. माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेला हा प्रकल्प 2 एकरांत उभा राहत असून त्याद्वारे शेतकरी व ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.</p>.<p>आठवडा बाजारात भाजीपाला विक्री करणार्या शेतकर्यांना व तो खरेदी करणार्या ग्राहकांना पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक शहरांतील बाजारांत अथवा मॉल मध्ये भाजीपाला अथवा अन्य वस्तू खरेदी करण्याला पसंती देतात. परिणामी स्थानिक शेतकर्यांना आपला भाजीपाला पुरेशा ग्राहकवर्गाअभावी व्यापार्याला मातीमोल किमतीत विकावा लागतो.</p>.<p>दुसर्या बाजूला ग्राहकालाही हा भाजीपाला व्यापार्यांकडून जास्त दराने घ्यावा लागत असल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांचेही नुकसान होते. हे नुकसान टाळता यावे यासाठी आ. कोकाटे यांनी त्यांच्या सोमठाणे या गावी थेट शेतकरी ते ग्राहक सेवा बाजारतळ उभारणी करण्याचे ठरवले. </p>.<p>यासाठी कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाकडून या कामास निधी देण्याची मागणी केली होती.</p>.<p>त्यानुसार नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समिती यांना हे काम मंजूर करण्याचे आदेश दिले असून सदर कामाचा प्रस्ताव नाविन्यपूर्ण योजनेत दाखल करण्यात आला. या प्रस्तावास जिल्हाधिकार्यांची नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये निधीही मंजूर करण्यात आला आहे.</p>.<p><em><strong>शेतकरी व ग्राहकांचा फायदा...</strong></em></p><p><em>या ठिकाणी मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकर्यांस उपलब्ध होणार आहे. शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकर्यांना शक्य होणार आहे.</em></p><p><em>थेट शेतकर्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान मिळेल तर, एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दुध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामिण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांची वेळ व पैसा वाचून त्यांना उत्तम दर्जाचा माल मिळणार आहे.</em></p>.<div><blockquote>शेतकर्यांना पिकविता येते. मात्र विक्रीचे कौशल्य त्याच्याजवळ नसते. त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहकसेवा बाजारातळाची संकल्पना मनामध्ये आली. शासन स्तरावर दाखल असलेला प्रकल्प मंजूर झाल्याने शेतकर्यांचे मोठे हित साधले जाणार आहे. ग्राहकांनाही शेतकर्यांकडील ताजा भाजीपाला व अन्य वस्तू थेट खरेदी करता येणार आहे.</blockquote><span class="attribution">माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर</span></div>