कळवण । Kalvan (प्रतिनिधी)
श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट येथे काम करणार्या कामगारांना कायम सेवेत घ्यावे, या मागणीसाठी सीआयटीयू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनतर्फे करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेतर्फे प्रसिद्ध पत्रकान्वये उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा सत्र न्यायधीश गणेश पी. देशमुख यांच्या नाशिक येथील दालनात दि. 5 मार्च दुपारनंतर सीआयटीयु पदाधिकारी व कामगार प्रातिनिधी यांची बैठक घेतली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सर्व 29 सेवकांंना 1 एप्रिल पासून टप्याटप्याने कायम करण्यात येतील, सुरक्षा रक्षक यांची यादी किमान वेतन ठरविण्यात येईल, महिला कामगारांना बाळंतपणाच्या कायद्यानुसार भरपगारी रजा देण्यात येईल, सर्व कामगार सेवक यांचा पाच लाखांचा मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात येईल आदी मागण्यांना मान्य करण्यात आल्या.
त्यामुळे 7 मार्च रोजी श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या कार्यालयासमोरील बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पी. देशमुख, कामगार प्रतिनिधी मुरलीधर गायकवाड, नारद अहिरे उपस्थित होते.
या सकारात्मक निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर शरद सिसोदे, देवीदास वाघमारे, संतोष पाटील, राजू गांगुर्डे, ताई पवार, सिंधूबाई वाघ, मंगल बर्डे यासह सेवक कामगारांनी साजरा केला.