
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (lasalgaon APMC) शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश दिले आहेत...
राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने सर्व 63 बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करणे, पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्या तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
निवेदनाची दखल घेतल्याने शिवसेना निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, बाळासाहेब होळकर, कांदा व्यापारी प्रवीण कदम, तालुका समन्वयक केशवराव जाधव, बापूसाहेब मोकाटे, संदीप पवार, जालिंदर गोजरे, संतोष वैद्य आदी शेतकरी बांधवांनी एकनाथ शिंदे, दादा भुसे यांचे आभार मानले आहेत.