
नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्य शासनाच्या धोरणानुसार तसेच 'माझी वसुंधरा योजना'( Majhi Vasundhra Yojana ) अंतर्गत ग्रामपंचायत ( Grampanchayat )हद्दीमध्ये पाण्याची शाश्वतता व पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींमध्ये सर्व शासकीय कार्यालये व गावातील घरांवर पाऊस पाणी संकलन करण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना दिले होते.
या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनानुसार पाणी व स्वच्छता विभागामार्फत नाशिक तालुक्यातील चांदशी, दरी, मातोरी, यशवंतनगर या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या चारही ग्रामपंचायतींअंतर्गत असलेले सर्व शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय यासह गावातील घरांवर पाऊसपाणी संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाऊस पाणी संकलन उपाययोजनांचे कामे करून या ग्रामपंचायती नाशिक जिल्हयासाठी आदर्श ग्रामपंचायती ठराव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. पाऊस पाणी संकलनासाठीच्या या अभिनव उपक्रमाचे नियोजन व संनियंत्रण साठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत येथे कार्यरत सेवक, सल्लागार यांना सदर प्रत्येक गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी नियुक्त केलेल्या ग्रामपंचायती सोबत सतत संपर्क व प्रत्येक आठवडयातील किमान 2 दिवस क्षेत्रभेटी देऊन वरील कामे पावसाळा सुरु होणे अगोदर पुर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.