नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनामुळे ( Corona )गेल्या वर्षी शाळा( Schools ) बंद होत्या. तरी काही काळानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये( ZP Schools ) शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके ( Text Books ) पुरविण्यात आली.
यंदा शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणही सुरू झाले, परंतु अजुनही नवीन पाठ्यपुस्तके वाटप झालेली नाहीत, अशा वेळी जिल्हा परिषदेने आपल्याच विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी वाटप केलेले सुमारे एक लाख पुस्तकांचे संच पुन्हा जमा केले आहेत. या पाठ्यपुस्तकांचे पुन्हा वितरण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वापरात आणले आहेत.
करोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद करण्यात आल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेपूर प्रयत्न केले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली होती. यंदा मात्र जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी देखील शासनाने पाठ्यपुस्तके पुरविलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत असून, शिक्षकांनाही पुस्तकांविना शिकवावे लागत आहे. एरव्ही शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनाकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.
शिक्षक़ांकडूनही विविध प्रयत्न
जमा करण्यात आलेली पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली असून, विद्यार्थ्यांंचे ग्रुप करण्यात आले आहे.त्यानुसार मुले मिळून अभ्यास करतात.सर्वांपर्यंत पुस्तक न पोहोचण्याचे मुख्य कारण मागील इयत्तेतील जमा केलेली पुस्तक आणि त्या इयत्तेत नवीन आलेली मुले त्यांच्या संख्येत तफावत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक पोहचू शकली नाहीत.
शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील चांगले पुस्तके परत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिक्षक, मुख्याध्यापकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांशी व पालकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पुस्तके परत केली. हीच पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत.तरी अनेक मुलांपर्यंत पुस्तक पोहोचली नाहीत त्यांनाही येत्या 15 दिवसात शासनांकडून आलेली पुस्तक मिळतील.
राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी.