<p><strong>नाशिक | Nashik (प्रतिनिधी)</strong> </p><p>नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याची यावर्षी देखील महाराष्ट्र संघात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही एकदिवसीय व ५० षटकांची स्पर्धा असते. दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कडून करण्यात येते.</p>.<p>आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधी २३ सामन्यांत सत्यजित बच्छाव ने महाराष्ट्र संघातर्फे ४२ बळी घेतले आहेत. भेदक गोलंदाजीबरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजित वेळेवेळी आपला वाटा उचलत असतो .<br><br>सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.<br><br>विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचा समावेश एलिट मधील डी गटात असून, २१ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यन्त एक दिवसा आड हिमाचल प्रदेश, मुंबई , राजस्थान , दिल्ली व पोंडेचरी संघांविरुद्ध लढती रंगणार आहेत.</p>