
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रथा-परंपरेनुसारच आम्ही मंदिरात धूप दाखवण्यास गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी दिली होती.
यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊन हा वाद आणखी चिघळल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन भगवान त्र्यंबकराजाचे बाहेरून दर्शन घेत तेथील परीस्थितीची माहिती घेतली होती. यानंतर भाजप (BJP)आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन मंदिरात महाआरती करत तेथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली होती.
अशातच आता नाशिक दौऱ्यावर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भेट देऊन महाभिषेक करत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिरातच पत्रकार परिषद (Press conference) घेऊन त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी राऊत म्हणाले की, आज त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेमुळे शहरात अशांतता निर्माण झाली होती. पंरतु, आता मंदिरात आणि शहरात कमालीची शांतता असून येथील लोक शांतताप्रिय आहेत. प्राचीन, ऐतिहासिक महत्व येथील वास्तूला असून मधल्या काळात काही लोकांनी याठिकाणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे राऊत म्हणाले की, त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwar City) काही लोक मला भेटली त्यांनी मला सांगितले की तुम्ही या शहराची बाजू घेतली गावाची भूमिका तुम्ही मांडली, त्याबद्दल आम्ही तुमचे स्वागत करतो. असे राऊतांनी म्हटले. तसेच त्र्यंबकेश्वर शहर आणि येथील घटनेचा काही लोकांनी राजकारण करण्याचा डाव केला. मात्र, येथील शांतताप्रिय लोकांनी तो डाव उधळून लावला, म्हणून या देशामध्ये त्र्यंबकेश्वर हे आदर्श गाव आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा (Kumbh Mela) होत असून सरकारने येथील विकासावर लक्ष्य द्यायला हवे. तसेच त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदी जवळजवळ गहाळ झाली असून त्या गोदावरीचा पुन्हा प्रवाह सुरु करण्यात यावा. याशिवाय त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी सरकारने एखादे प्राधिकरण निर्माण करावे. तसेच अयोध्या, वाराणसीप्रमाणे ऐतिहासिक मंदिरांच्या विकासासाठी देखील सरकारने प्राधिकरण निर्माण करावे असे राऊत यांनी सांगितले.