निफाड | वार्ताहर | Niphad
गोदाकाठच्या गोदावरी नदीपात्रात (Godavari River Basin) पानवेलींचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने पानवेली काढण्यास दुर्लक्ष केल्याने करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके यांनी शनिवारी अतिशय आक्रमक भूमिका घेत थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनाच शिवसैनिकांसह घेराव घालत जाब विचारला आहे...
चांदोरी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाळू उपसा (Pump the sand) केंद्राचे उद्घाटन शनिवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी विखे-पाटील यांच्या भाषणानंतर खंडू बोडके यांनी थेट व्यासपीठाकडे धाव घेत महसूलमंत्र्यांना पानवेली काढल्याशिवाय गोदावरी नदीपात्रातील वाळू उपसा करु नये, अशी मागणी करत शिवसैनिकांसह घेराव घातला.
त्यानंतर मंत्री विखे-पाटील यांनी बोडके यांच्या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे यांना तत्काळ पानवेली काढण्याचे निर्देश दिले. यावेळी पानवेली काढण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती जिल्हाधिकारी डी.गंगाथरन (Collector D.Gangatharan) यांनी बोडके यांना दिली. बोडके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत संबधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ करंजगाव व सायखेडा पुलावर पानवेलींची पाहणी करण्यासाठी पाठवले.
दरम्यान, यावेळी बोडके यांच्यासमवेत चांदोरीचे सरपंच विनायक खरात, उपसरपंच संदीप टरले, सदस्य आबा गडाख, प्रकाश ढेमसे, दौलत टरले, सचिन गडाख, संदिप जाधव, दिगंबर खालकर, सोमनाथ बस्ते, गणेश शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.