
निफाड । प्रतिनिधी | Niphad
तब्बल चार दिवस बरसलेल्या पावसामुळे (rain) ग्रामिण भागातील जनजीवन कोलमडून पडले असून विजेचे खांब (Electricity pole) पडल्याने विजपुरवठा खंडीत (Power outage) झाला. साहजिकच त्याचा थेट परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर (Public water supply schemes) झाला आहे. अनेक गावांना चार दिवसानंतर देखील पाणीपुरवठा (Water supply) होवू शकला नाही.
या पावसामुळे रस्त्याची पुरती वाट लागली असून गल्लीबोळात साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ (Increase in mosquitoes) होवून साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने (Department of Health) गावात डासनिर्मूलन मोहीम राबविणे गरजेचे आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पीके वाया जाण्याचा धोका वाढला आहे.
आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही हजेरी लावणे सुरूच ठेवले आहे. सततच्या पावसामुळे गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठची पीके पाण्याखाली गेली होती. आता पूर ओसरत असला तरी देखील ही पीके वाचणे अवघड आहे. कारण शेतात अद्यापही पुराचे पाणी असल्याने हे पाणी कोठे अन् कसे काढावे याचे उत्तर मिळत नाही.
नदीकाठाबरोबरच इतर ठिकाणच्या पिकांना देखील अतिवृष्टीचा (heavy rain) फटका बसला आहे. पावसामुळे विद्युत पोल आडवे पडले त्यामुळे अनेक ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर जेथे विजपुरवठा (Power outage) आहे तेथील विद्युत पंप (Electric pump) सुरू होवू शकत नाही. त्यामुळे गोदाकाठच्या अनेक गावातील पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कोलमडून पडल्या आहेत. चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीच नाही अन् पावसामुळे घराबाहेर देखील पडता येत नाही. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर येवू लागले होते. मात्र काल बुधवारी पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतातील उभी पीके वाया जाण्याचा धोका वाढला आहे.
साहजिकच दुबार पेरणीचे संकट कायम आहे. मात्र जमिन कोरडी झाल्यावरच दुबार पेरणी करता येणार आहे. सततच्या पावसामुळे नाल्या, खड्डे अन् रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने आता डासांच्या प्रमाणात वाढ होवून साथीच्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच गावागावात डासनिर्मूलन औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
तसेच गेली दोन वर्षे करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी उभारी घेण्याचा प्रयत्न करीत असतांनाच आता पावसाने दणका देत मोठ्या कष्टाने उभी केलेली पीके हिरावून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शासनाने अशा शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीमशागतीसाठी आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे. करोना प्रादूर्भावानंतर अन्न-धान्यासह किराणा माल, खते, बियाणे, औषधे, पेट्रोल, गॅस, डिझेल यासह इतर वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने नागरिकाला जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.