नाशिक | Nashik
परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भातपिंकासह शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे उध्वस्त झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अवघा बळीराजा चिंतातूर झाला आहे.
याची गंभीर दखल घेत मेटाकूटीला आलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आज शनिवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीमालाची पिकांची पाहणी केली.
शेतीमालासह भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना सवोत्तपरी सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी खा. गोडसे यांनी तहसीलदारांसह महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील परतीच्या पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भातपिंकासह शेतीमालाचे मोठे नुकसान केले आहे. या अस्मानी संकटामुळे भात पिकांसह शेतीमालाचे कधी नव्हे इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच उत्पन्न येणार नाही.
याविषयीच्या अनेक तक्रारी वजा व्यथा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा. गोडसे यांच्याकडे समोर मांडल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत खा. गोडसे यांनी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा, निरगुडे, हरसूल, तोरंगण, जातेगाव आदी गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या भात पिकांची पाहणी केली.
परतीचा पाऊस बेसुमार झाल्याने तालुक्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. यानंतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना सवोत्तपरी सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी खा. गोडसे यांनी तहसीलदार गिरासे यांच्यासह महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.