रेशनचे धान्य वितरणाने दिलासा

मनमाड येथील एफसीआयच्या गोदामातून धान्य उपलब्ध
रेशनचे धान्य वितरणाने दिलासा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत नाशिक आणि मालेगाव शहरासह जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येक दुकानात 100 टक्के धान्य पोहचले आहे.

उर्वरित आठ तालुक्यातही धान्याचे वितरण सुरु असून आतापर्यंत 60 टक्के माल त्यांच्यापर्यंच पोहचला आहे. म्हणजे 2609 दुकनांपैकी तब्बल 2083 दुकानांत पूर्ण माल पोहचल्याने गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.

पंजाबमधील किसान आंदोलनामुळे जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रेशनचे धान्यच उपलब्ध होऊ शकले नव्हते. आणि ते मिळण्याबाबतही शंकाच निर्माण झाली होती. एफसीआयला प्रशासनाकडून इतर राज्यांतून धान्य उपलब्धीसाठी गळ घालण्यात आली होती.

सर्व प्रयत्नांनंतर अखेर मनमाड येथील एफसीआयच्या गोदामातून धान्य उपलब्ध झाले. तेथून वाहतूकीसाठी ट्रक आणि इतर मालवाहू गाड्याही मोठ्या दिव्यानंतर उपलब्ध झाल्या. शिवाय गाड्यांची संख्या कमी असल्याने हमालांनी दिवसरात्र काम करुन प्रत्येक गाडी खाली करत, भरुन देत दिवाळीपुर्वी जवळपास निम्म्या जिल्ह्यात 100 टक्के धान्य पोहचविले.

तर उर्वरित भागात 60 टक्क्यांपेक्षा जास्त धान्य वितरीत केले. त्यामुळे आता कुठे या गोरगरिब नागरिकांना रेशनवरील धान्य दिवाळीत उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच आता दोन दिवसांपासून रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

या तालुक्यात पोहचले शंभर टक्के धान्य-

नाशिक शहरासह तालुक्यात, मालेगाव शहरासह तालुक्यात, निफाड, देवळा, कळवण, त्र्यंबक, येवला, शंभर टक्के रेशनचे धान्य पोहचले आहे.

येथे 60 टक्के माल पोहचला-

पेठ, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, बागलाण, या तालुक्यात 60 टक्के माल पोहचला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com