नाशिक । Nashik
कोकणासह मराठवाडा व विदर्भात दमदार कोसळणार्या पावसाच्या सरींनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. सोमवारी (दि.२०) शहरासह जिल्ह्यात पावसाने नुसता शिडकावा टाकला. दमदार पावसाअभावी दुबार पेरणीची शेतकर्यांवर टांगती तलवार आहे.
जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज उत्तर महाराष्ट्र वगळता खरा ठरत आहे. इतरत्र धो धो पडणार्या वरुण राजाने नाशिक जिल्ह्यावर अद्याप कृपा केली नाही. मागील आठवडाभरापासून आभाळ गच्च भरुन येते. मात्र शिडकावा टाकावा अशा पावसाच्या सरी कोसळत आहे.
दिवसभर उन सावलीचा खेळ सुरु असल्याचे पहायला मिळते. कधीकधी तर दुपारी टळटळित उन पडते. पावसाच्या या लहरीपणामुळे बळिराजाने केलेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दमदार पावसाअभावी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील भात शेती धोक्यात आली आहे.