<p><strong>देवळाली कॅम्प l Deolali Camp (वर्ताहर) :</strong></p><p>स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्य संदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरीस स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केलेली होती.</p>.<p>मात्र नाव देण्याबाबतची संपूर्ण भूमिका निवेदनात विशद करण्यात आलेली असतानाही संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळले त्यामुळे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने आज भगूर मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा जाहीर निषेध नोंदवला, मात्र यामध्ये देखील काहीजण बुद्धिभेद करून यांचा कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध असल्याचे भासवत आहेत वस्तुतः सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, गोविंदाग्रज, रामदास स्वामी या सर्वांचेच कार्य हे असामान्यच आहे.</p><p>त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही मात्र ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो त्यांच्या नावाला विरोध केला जातो या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे म्हणून हा निषेध नोंदविण्यात आलेला आहे.</p><p>आजच्याच दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी १९६६ साली स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अंतिम समयी आपले कार्य समाप्त झाले म्हणून प्रायोप्रवेशन सुरू केले होते म्हणूनच आज त्यांच्या जन्मभूमी भगूर येथे साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा जाहीर निषेध करण्यात आला.</p><p>यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, मृत्यूंजय कापसे, प्रमोद आंबेकर, निलेश हासे, भुपेश जोशी, श्याम देशमुख, गणेश राठोड, रामदास गाढवे, प्रवीण वाघ, सुनील जोरे, रतन वाघचौरे, शांताराम करंजकर, मधुकर कापसे, चेतन आंबेकर, रमेश नाईकवाडे, चेतन आंबेकर आदी उपस्थित होते.</p>