देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp
परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भातपिंकासह शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे उध्वस्त झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन खा.हेमंत गोडसे यांनी शनिवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीमालाची पिकांची पाहणी केली.
शेतीमालासह भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना खा. गोडसे यांनी तहसीलदारांसह महसूल विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील परतीच्या पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भातपिंकासह शेतीमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हाती काहीच उत्पन्न येणार नाही. याविषयीच्या अनेक तक्रारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकर्यांनी खा.गोडसे यांच्याकडे समोर मांडल्या होत्या.
शेतकर्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा, निरगुडे, हरसूल, तोरंगण,जातेगाव आदी गावांना भेटी देत शेतकर्यांच्या भात पिकांची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार दिपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, संजय पाटील, मंडल अधिकारी सुयोग वाघमारे, दिवटे तात्या यांच्यासह रवी वारूगंसे, संपत चव्हाण, विनायक माळेकर, मिथुन राऊत, विष्णू बेंडकुळे, अनिल बोरसे, अंबादास बोरसे, रघुनाथ गांगोडे, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.