कळवण । प्रतिनिधी
महावितरण कंपनीने कळवण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन खंडित केले आहे. त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कळवण तालुक्यात महावितरण कंपनीमार्फत 86 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांना 131 वीज कनेक्शन दिले आहेत. त्यांची वीज बिलापोटी 3.28 कोटी इतकी रक्कम थकबाकी आहे. तालुक्यात पथदीपांसाठी दिलेल्या कनेक्शनचीही थकबाकी रक्कम 10.45 कोटी आहे. वर्ष अखेर असल्याने त्याच्या वसुलीकरता सर्व ग्रामपंचायतींना महावितरण कडून नोटीस बजावण्यात आल्या आहे.
परंतु ग्रामपंचायतीने वेळेत भरणा न केल्याने वसुली मोहिमेअंतर्गत 32 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तीन ग्रामपंचायतीने वीजबिल भरल्याने त्यांची पुनर्जोडणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत विभागाकडून थकबाकीचा भरणा होत नसल्याने त्यांचा थकबाकीचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या पथदीप वीज कनेक्शन खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.