नाशिक । प्रतिनिधी Nashik
तंबाखू ( Tobacco) खाऊ नका सांगतो तरी 30, 40 पुड्या खातो म्हणत मोठी फुशारकी मारत बोलतात आणि कॅन्सरसारख्या ( Cancer )जीवघेण्या आजाराला निमंत्रण देतात. यापुढे तरी कर्करोगाला जवळ करु नका. इतरांनाही त्यापासून वाचावा. कॅन्सरमुक्त अभियानात सहभागी व्हा. असे आवाहन आज माजीमंत्री आ. गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan )यांनी केले.
भाजप जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवले जात असलेल्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या 51 व्या मोफत कॅन्सर शिबिराचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ, आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, माजी महापौर रंजना भानसी, ज्येष्ठ नेते विजय साने, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे यावेळी उपस्थित होते. जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली वसंत स्मृती येथे हा कार्यक्रम झाला.
महाजन पुढे म्हणाले, कॅन्सरचे वाढत प्रमाण चिंताजनक आहे. आपण वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना मोठी मोहीम राबवली होती. गेल्या 30 वर्षांपासून मी आरोग्य क्षेत्रात काम करतोय, मुंबईत उपचार केले जातात. त्यावेळी रुग्णांची दयनीय अवस्था पाहून कीव येते. तंबाखू खाऊ नका सांगतो. मात्र ऐकून घेतात आणि सोडून देतात. त्यामुळे समस्या गंभीर होत आहे.
.
चित्रा वाघ म्हणाल्या, बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढतं आहे. ग्रामीण भागात या आजाराबाबत अद्याप फारशी जनजागृती नाही. महिलांमध्ये कॅन्सरचे वाढत प्रमाण चिंताजनक आहे. भारतात गर्भाशय कॅन्सरने मृत्यूचे प्रमाण अधिक असून अनेक महिला भीतीने तपासणीसाठीही येत नाही, त्यांनी भीती दूर करुन चाळीशीनंतर तपासणी केलीच पाहिजे. असे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांंनी कॅन्सरमुक्त अभियानाची माहिती दिली. गेल्या 50 शिबिरात सव्वालाख जणांची तपासर्णी झाल्याचे ते म्हणाले
दानशुरांच्या मदतीने हा प्रकल्प सुरु आहे. आजपर्यंंत जैन समाजाने समाजाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. तोे यापुढे असाच कायम राहील. देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविक केले. रवी पारख, अमित बोरा, ललित नहार, परेश शाह, प्रफुल्ल संंचेती, योगेश पटणी विकास पगारे, विजय बेदमुथा, कांतीलाल चोपडा, सुनील केदार, संजय चव्हाण, सुरेश पाटील, गणेश कांबळ, सुजाता करजगीकर, प्रदीप पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती राजवटीची भूमिका आमची नाही
राष्ट्रपती राजवट लावण्याची आमची भूमिका नाही, पण राज्यातील स्थिती योग्य नाही. मंत्री जेलमध्ये जात आहेत. हल्ले करायचे, राजकारण करायचे, काही झाले की भाजपच्या नावाने खापर फोडायचे, असे उद्योग सध्या राज्यात सुरु आहेत. अशी टीका आज माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ते म्हणाले, पोलीस ठाण्यात हल्ला होतो. पोलीस संरक्षणात हल्ला होतो. हे आक्षेपार्ह आहे. त्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही, हे दुर्देव आहे. वाटेल ते गुन्हे नोंदवायचे, पोलिसांचा गैरवापर करायचा, माझ्याबाबत तेच झाले, पेनड्राईव्हने सत्य समोर आलें. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टिकास्र सोडले. खोट बोला, पण रेटून बोला. असा त्यांचा भोंगा कायम सुरु असतो.