नाशिकरोड | Nashikroad
अनेक दिवस बंद असलेली महत्वाची पंचवटी एक्सप्रेस येत्या...
१२ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या गाडीने नोकरदार, व्यावसायिक मोठ्या संख्येने प्रवास करतात.
याबाबत राजधानी दिल्लीतील रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या सर्व विभागांना पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पंचवटी एक्सप्रेससह देशात एकूण 80 विशेष प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.
तथापी, सध्या सुरु असलेल्या श्रमिक ट्रेन आणि विशेष ट्रेनखेरीज या 80 गाड्या वेगळ्या असतील. या गाड्यांचे रिझर्व्हेशन अगोदर करावे लागेल. महत्वाचे म्हणजे काही राज्य सरकारांनी प्रवासी रेल्वेला अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या 80 रेल्वेगाड्यांना संबंधित राज्य सरकारांच्या नियमानुसारच थांबा राहील.
पंचवटी एक्सप्रेस बंद असल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत होते. त्यांच्या नोक-या धोक्यात आल्या होत्या. त्यामुळे पंचवटी सुरु करावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. नवी दिल्लीत जाऊन रेल्वे बोर्डाकडेही मागणी केली होती.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब केदारे तसेच रेल परिषदनेही पंचवटी सुरु करण्याचे स्वागत केले आहे.
पंचवटी बरोबरच राज्यराणी, गोदावरी या महत्वाच्या गाड्याही त्वरित सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.