नामपूर । वार्ताहर Nampur
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ( Nampur APMC )आवारात बुधवार, दि. 4 मे रोजी सकाळी 9 वाजता कांदा उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी अनेक शेतकर्यांनी नैसर्गिक संकटांचा सामना करीत मोठ्या कष्टाने उत्पादीत केलेल्या कांद्याला सध्या अत्यल्प भाव मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनचे अध्यक्ष भारत दिघोळे, शेतकरी न्याय संघाध्यक्ष विनायक शिंदे, कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव उपस्थित राहणार आहेत.
कांदा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात यावा, कांद्यास उत्पादनाच्या दोनपटीने भाव देण्यात यावा, नाफेडमार्फत कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, कांदा वाहतुकीसाठी रेल्वेरॅक उपलब्ध करण्यात यावेत, नामपूर बाजार समितीत शेतकरी नेते शरद जोशी यांचा पुतळा उभारण्यात यावा आदी प्रमुख विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे.
परिषद यशस्वी होण्यासाठी बाजार समितीचे सर्व संचालक तसेच शरद जोशी विचार मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असून बागलाणसह जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.