<p><strong>इगतपुरी । Igatpuri (प्रतिनिधी)</strong></p><p>महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत “माझी वसुंधरा अभियान” राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.</p>.<p>त्या अनुषंंगाने इगतपुरी शहरात वायू प्रदूषण कमी करणेकामी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इगतपुरी नगरपरिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी इगतपुरी शहरातून सायकल रॅलीचे आयोजन मुख्याधिकारी निर्मला गायकवाड/पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.</p><p>या सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शहरातील युवा वर्ग, तसेच सायकल पटु यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवुन खुप चांगला प्रतिसाद दिला. रॅलीची सुरुवात सकाळी तानाजी टी स्टॉल, खालची पेठ येथून निघून राममंदिर ते शहरातून फिरून नगर परिषदेजवळ समारोप झाला.</p><p>नगरपरिषद येथे रॅलीच्या समारोप प्रसंगी जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, सुनिल आहेर, प्रदिप रजपुत, अविनाश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन नागरिकांची पर्यावरण विषयक आपली जबाबदारी बाबत जाणीव करुन दिली.</p><p>तसेच आपले आरोग्य कसे चांगले राहिल याबाबत डॉ. प्रदिप बागल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून घोटी येथील सायकलिस्ट डॉ. कैलास गायकर, निलेश बोराडे, प्रकाश भाऊ उपस्थित होते.</p><p>मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी सर्वांचे कौतुक करुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल आभार मानले. तसेच “माझी वसुंधरा” जोपासने कामी पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश या पंचतत्त्वांचे महत्त्व पटवुन दिले. इगतपुरी शहरात महिन्याच्या प्रत्येक १५ तारखेला सायकल रॅली घेतली जाणार असे घोषित केले.</p><p>अजुनही नवनविन उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी इगतपुरी शहरातील सर्व जनतेस आव्हान केले. आवश्यक असेल तेव्हाच वाहनाचा वापर करावा असेही आवाहन केले. या सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान व नगरपरिषदेच्या कर्मचारी यांनी प्रयत्न केले.</p>