<p><strong>नाशिक l Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>नाशिकमध्ये २६ मार्चपासून होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन यांनी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिली.</p>.<p>याबाबत माहिती देताना निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले आणि ज्ञानाची गंगा महाराष्ट्रातील कानाकोपर्यापर्यंत घेऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणारे ज्ञानशिक्षणाचे महाद्वार आहे.</p><p>येत्या साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठासारखी सशक्त आणि लोकाभिमुख संस्था आयोजकांना सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी रहावी, याकरिता काल संमेलन आयोजकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू वायूनंदन यांची भेट घेऊन संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली.</p><p>नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन ही नाशिककरांच्या दृष्टीने आणि तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना असून, या साहित्याच्या महोत्सवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सक्रिय सहभाग नोंदवेल आणि आयोजनात सर्वतोपरी सहकार्य करणे ही केवळ संधी नसून आमची जबाबदारीही आहे, अशी ग्वाही कुलगुरू वायूनंदन यांनी शिष्टमंडळाला दिली.</p><p>यावेळी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, संजय करंजकर, नाट्यदिग्दर्शक तथा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक सचिन शिंदे, विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचे सहयोगी सल्लागार दत्ता पाटील उपस्थित होते.</p>