
नाशिक | प्रतिनिधी | nashik
नाशिकच्या सर्व बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. नाफेडचे अधिकारी न आल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याची माहिती मिळत आहे. कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कालच केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कांद्याबाबत बैठक घेतली होती...
केंद्र सरकारने (Central Goverment) कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Export Duty) लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून शेतकरी (Farmer) आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत कांद्याला २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले.
त्यांनतर कांदा व्यापारी असोसिएशनने (Onion Traders Association) जिल्ह्यातील कांदा लिलाव (Onion Auction) बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. काल केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी मंत्री पवार यांनी बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढत कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. आजपासून पुन्हा एकदा कांदा लिलावास सुरुवात होणार होती. मात्र नाफेडचे अधिकारी न आल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरले असून चांदवड चौफुलीजवळ शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनाप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.