त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer
विकेंडला हरिहर किल्ल्यावर झालेली तुफान गर्दी ची अखेर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दखल घेतली असून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी त्र्यंबकेश्वर भागातील पर्यटन स्थळांवर गर्दी करण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. वनविभागाला ही तशी सूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली.
दरम्यान पावसाळ्यात निसर्ग सहलीसाठी त्र्यंबकेश्वर , पहिने बारीत पर्यटक येत असतात. अशावेळी पर्यटकांकडून करोना नियमांचे उल्लंघन केले जाते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अलिकडेच प्रसिद्ध हरिहर किल्यावर मोठी गर्दी पर्यटकांची झाली होती. किल्ल्यावर जाण्यासाठी रांग लागली होती. कोविड काळात अशी गर्दी अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी पाच सायंकाळी पाच या काळात जमाबंदी व सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोणीही पर्यटनस्थळी अथवा इतरत्र गर्दी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्रंबकेश्वर पोलिसांनी दिला आहे. याबाबत ब्रह्मगिरी पायथ्याशी फलक लावण्यात आले असून मार्ग बंद करण्यात आले आहे.