
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा उपनिबंधक व नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या (Nashik Road-Deolali Vyapari Bank) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा (Corruption) आरोप लावून त्यांच्या कार्यालयात घुसून नोटा उधळल्या प्रकरणी परिवर्तन पॅनलच्या आठ जणाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक येत्या ११ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत (Election) १ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. परिणामे बँकेची निवडणूक होण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर ज्या उमेदवाराला निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी सर्वसाधारण गटासाठी दोन लाख रुपयांच्या ठेवी व वीस हजार रुपयांचे शेअर्स तर इतर मागासवर्ग गटासह व इतर गटांसाठी एक लाख रुपयांच्या ठेवी आणि दहा हजार रुपयांच्या शेअर्स घेण्याचे बंधनकारक घेण्याचा निर्णय बँकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.
या प्रस्तावाला सहकार आयुक्त (Cooperative Commissioner) यांनी देखील मंजुरी दिली होती. परिणामी या निर्णयाविरोधात परिवर्तन पॅनलचे नेते हेमंत गायकवाड व चंद्रकांत विसपुते यांनी सहकार मंत्री यांच्याकडे पोट नियम क्रमांक ४० मध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, सहकार मंत्र्याच्या या निर्णयाविरुद्ध सहकार पॅनलचे उमेदवार निवृत्ती अरिंगळे व सुनील चोपडा यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती.
याबाबत उच्च न्यायालयाने निकाल देऊन शासनाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी शासनाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविली असता त्यात ५६ उमेदवारांचे (Candidates) उमेदवारी अर्ज अवैध ठरविले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी निषेध म्हणून व निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते.
त्यानंतर परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या कार्यालयात घुसून निषेधाच्या घोषणा देत भ्रष्टाचाराचा आरोप केला व बलसाने यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. यानंतर ही घटना राज्यभर गाजली व सोशल मीडियातून नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेची सहकार आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. तर या घटनेप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला व घोषणा दिल्याप्रकरणी परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, श्याम गोहाड, गंगाधर उगले, तानाजी गायधनी, विश्वास चौगुले, निवृत्ती दत्तात्रयअरिंगळे, आदेश पवार व श्रीराम (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह २५ ते ३० जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.