नाशिक । प्रतिनिधी
राज्यात महसूल विभागात बदल्यांचा बार उडाला असून रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे. त्यांचा पदभार हा नितीन मुंडावरे यांच्याकडे सोपविण्यात अाला आहे.
राज्यात १५ आॅगस्टनंतर आयएएस अधिकार्यांच्या बदल्या होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नाशिक जिल्ह्यात पोलिस आयुक्त डाॅ. विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बदलीची जोरदार चर्चा आहे.
त्यात दबक्या आवाजात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या देखील नावाची जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा ऐकू येत आहे. पण मांढरे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारुन दीड वर्ष देखील पूर्ण झाले नाही. तसेच लोजप्रतिनिधींशी जुळवून घेणे, करोना संकटात मालेगाव पॅटर्नचा डंका व प्रशासनावर असलेली घट्ट पकड ते बघता जिल्हाधिकारी मांढरे यांच्या बदलीची शक्यता कमीच आहे.
तर पोलिस आयुक्त नांगरे पाटिल हे बदलीसाठी स्वता: इच्छूक असल्याचे समजते. राज्यार १५ आॅगस्टनंतर बदलीचा बार उडेल असे बोलले जात आहे. मागील आठवड्यापासून मनपसंत ठिकाणी बदल्यांसाठी अधिकार्यांची मंत्रालयात वर्दळ होती. नविन सरकार अस्तित्वात आल्यावर सनदी अधिकार्यांच्या बदल्याकरुन प्रशासनात भाकर फिरवली जाते.
पण सरकार स्थापन झाल्यावर दोन तीन महिन्यातच करोनाचे संकट आले. त्यामुळे या परिस्थितीत बदल्या केल्या असत्या तर अधिकार्यांची नवीन जागी काम करताना तारंबळ उडाली असती. त्यामुळे बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. सोमवारी महाविकास आघाडिची बैठक झाली व त्यात बदल्यांना हिरवा कंदिल देण्यात आला.