
चांदवड | वार्ताहर | Chandvad
एकीकडे कांदा आणि अन्य शेतीमालाचे (Agriculture) दर घसरले आहेत, तर दुसरीकडे गॅस, पेट्रोल-डीझेलसह (Petrol-Diesel) खाद्यान्नाचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहे.
मात्र अद्याप सरकारकडून कुठलीही मदत शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) रस्ता रोको आंदोलन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे करण्यात आले. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ (Samir Bhujbal) यांनी यादरम्यान दिला आहे.
कांदा व अन्य शेतमालाला हमीभाव मिळणे व इंधनाचे दर कमी करणे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई देणेबाबत आज माजी खासदार समीर भुजबळ (Former MP Sameer Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, आमदार दिलीपकाका बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दिपीका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरणार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.