नाशिक । प्रतिनिधी Nashik
महानगरपालिका आणि 7 महाराष्ट्र बटालियन यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदिनी नदीची ( Nandini River )स्वच्छता करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी येथील रामदास स्वामी मठ येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण अभियानाला सुरुवात करण्यात आली.
7 महाराष्ट्र बटालियनच्या 365 कॅडेट्सनेही या मोहिमेत सहभाग घेतला. नाशिक शहरातील सर्व एनसीसी कॅडेट्स यांची ‘स्वच्छता दूत’ आणि ‘पर्यावरण दूत’ म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी यावेळी घेतला. ’कुठेही चुकीचे काम होताना दिसून आले, पर्यावरणाला हानी पोचवण्यासारखे काही घडत असल्याचे दिसून आले तर कॅडेट्स थेट मला भेटून माहिती देऊ शकतात’ असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. नाशिक शहर सुंदर, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी सर्व जण एकत्र येऊया आणि सर्वांनी मिळून शहरातून वाहणार्या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊया. नाशिक अजून चांगलं शहर बनवूया, असे आवाहन आयुक्तांनी केले.
दोन टन कचरा गोळा
या अभियानात 1,950 किलो कचरा गोळा करण्यात आला. तसेच 50 पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले. खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी मनपाच्या अभियानाचे कौतुक करुन युवकांसह नाशिककरांना मोहिमेत सहभागाचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या पुनीत सागर अभियानंतर्गंत व 75 व्या अमृतमहोत्सव निमित्त स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल रवि व्यास आदी उपस्थित होते.