नाशिक | प्रतिनिधी
आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिकशहरातील विविध भागात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह अवकाळी पावसाच्या आगमनामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. बागलाण, सिन्नर तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली...
बागलाण तालुक्यातील मुंगसे, पिंगळवाडे परिसर तसेच साल्हेर मुल्हेर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट होता आणि गारादेखील पडल्यामुळे काढणीस आलेल्या उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
कांद्याच्या शेतात गारांचा थर बसलेला दिसून येत आहे. तर अनेक घरांच्या आजूबाजूला गारपीट झाल्याने थर साचलेले दिसून येत आहे.
देवळा तालुक्यात उन्हाळ कांदा मार्केटमध्ये सुरु झाल्यानंतर चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असताना हातातोंडाशी आलेला घासच आता अवकाळीने हिरावून नेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अवकाळीच्या चक्रव्यूहात सापडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली.
सिन्नर तालुक्यात विंचूर दळवी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. तर त्र्यंबकेश्वरमध्ये आज दुपारी तीन ते साडे तीन या काळात जोरदार पाऊस झाला. सुरवातीला टपोऱ्या गारा पडल्या. अचानक आभाळ दाटून आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळाची हजेरी यामुळे त्र्यंबक तालुक्यातील जोरदार मोहराने बहरलेली आंब्याच्या झाडांचा मोर पावसाने पाडून टाकला. सायंकाळपर्यंत याठिकाणी पावसामुळे वातावरण पावसाळ्याप्रमाणेच झाले होते.