ओझे | विलास ढाकणे
दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीमार्फत वसुलीचा तगादा लावला आहे. त्याप्रमाणे ज्या सभासद शेतकऱ्यांचे इतर राष्ट्रीयकृत बॅकेत खाते आहे, अशा सभासदाचे इतर बॅकातील खाते सिल करण्याचे आदेश ग्रामीण भागातील सोसायटी व जिल्हा बॅक शाखाना देण्यात आल्यांमुळे शेतकरी सभासदानी नाराजी व्यक्त केली आहे....
दरम्यान, बँकेचे कर्ज गेल्या अनेक दिवसांपासून थकीत ठेवल्यामुळे बँक अडचणीत आहे. त्यामुळे हेतूपुरस्कर कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदारांवर बँकेकडून कारवाई केली जात आहे. असे केले नाही तर बँकेची आर्थिक परिस्थिती सुधार नाही अशी माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली.
गेल्या दोन द्राक्ष हंगामात शेतकरी वर्गाला द्राक्षाचे पैसे न झाल्यांमुळे आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. चालू वर्षी शेतकरी वर्गाने उसनवारी करून द्राक्षबागेचा हंगाम पार पडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकाचे पुन्हा होत्यांचे नव्हते करू टाकले. त्यामुळे द्राक्षउत्पादक पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. गेल्या दोन वर्षीपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीने अडचणीत येत असताना जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना वसुलीचा तगादा लावणे चुकीचे असल्याचे म्हटले जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅकेने जिल्ह्यातील शेतक-यांची दोन वर्षीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कडक वसुली मोहिम थांबवावी. तसेच इतर बॅकामधील खाते सिल करण्याचा विचार करु नये अशी चर्चा शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे.