नाशिक | दिलीप साळवेकर
स्वातंत्र्यास पन्नास वर्ष होत आली होती. पण देशात गरीबी कमी झाली नव्हती. भ्रष्टाचार वाढला होतो. यामुळे कुसुमाग्रज अस्वस्थ होते. देशातील ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी कवितेचा आधार घेतला अन् स्वातंत्र्यदेवीची ही कविता साकारली.
ही कविता जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पाहिली, त्यांना ती खूप भावली. त्यांनी या कवितेच्या हजारो प्रती छापून घेतल्या आणि सर्वच सरकारी कार्यालयात लावल्या.
तात्यासाहेबांना ’गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता सुचली, ती एक अदभूत घटना आहे. 1942 मध्ये ते पुण्यात एका दैनिकात कार्यरत होते. रात्रपाळीस काम करत होते. तेव्हा एका क्रांतीकारकासंदर्भात बातमी आली.
ती बातमी त्यांनी हातावेगळी केली. परंतु त्यानंतर त्यांच्या मनात असंख्य विचार घोळू लागले. ते विचार शब्दांत उतरवले तेव्हा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा...’ ही कविता तयार झाली. या कवितेने देशाच्या स्वातंत्रलढ्यात मोलाची कामगिरी बजावली.
या कवितेने स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तर त्यांची दुसरी कविता ’स्वातंत्रदेवीची विनवणी’ हिने स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती मांडली. ही कविता तात्यासाहेबांनी एका फटक्याप्रमाणे लिहिली.