मटाने | प्रविण आहेर
पंचक्रोशीत सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रचार जोरदार सुरु आहेत. एकीकडे प्रचार आणि दुसरीकडे निसर्गाने फिरवलेले चक्र यामुळे बळीराजा ऐन प्रतिष्ठेच्या रनधुमाळीत संकटात सापडला आहे. शेतमालाचे अतोनात नुकसान होऊनही त्याचे नुकसान बघायला मात्र प्रचाराला येणाऱ्या पुढाऱ्यांना वेळ नाही...
सोशल मीडियात अनेक शेतकऱ्यांनी अवकाळीमुळे झालेले नुक्सार शेअर केले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून देवळा तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे.
देवळा तालुक्यातील शहराचा काही भाग, लोहणेर, सावकी, खामखेडा, मटाने, वरवंडी, विठेवाडी या गावांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांची चांगलीच नासाडी केली आहे.
शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावला आहे. चांदवड देवळा परिसर हा कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहे या हंगामात लाल कांदे काढणी आणि उन्हाळी कांदा लागवड सध्या चालू आहे.
काही दिवसांपूर्वी माळवाडी येथील शेतकऱ्याने रात्री कांदा लागवड केली ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती.
इतकी मेहनत करून सुद्धा उत्पादन मिळेलच याचा भरवसा नसतो. तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्यासारखा प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे.
याआधी कांदा प्रश्नावर मोठे राजकारण झाले कसेबसे निर्यात सुरू झाली आणि निसर्गाने साथ सोडली. काल रात्री मटाने परिसरात पावसामुळे कांदा पिकात पाणी साचले आहे आणि इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले.
ग्रामपंचायत पॅनलच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या वचननाम्यात शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा उमेदवारास शेतकऱ्यांची पसंती असेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून होत आहे.