नंदिनी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

नंदिनी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

नाशिक । निशिकांत पाटील

ऐेतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या गोदामाईचे पाणी शुद्ध व पवित्र मानले जाते. त्याचीच एक उपनदी म्हणजे नंदिनी नदी (Nandini River) या नदीमध्ये स्वच्छ पाणी (water) कमी तर दुर्गंधीयुक्त व आरोग्यास घातक पाणी जास्त आढळून येत आहे. तसेच नदीपात्रात बर्‍याच ठिकाणी कचरा (garbage) साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नंदिनी नदीच्या प्रदूषणाला (Pollution) महापालिका प्रशासनासह अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील (Ambad and Satpur Industrial Estate) नागरिक तितकेच जबाबदार आहे. नदीत होणारे प्रदूषण थांबले नाही तर नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) डोंगरदर्‍यातून वाहणारी नंदिनी नदी नाशिक शहरात नासर्डी नावाने परिचित होती. नदीची गेल्या कित्येक वर्षांपासून गटारगंगेसारखी अवस्था झाली आहे.

शहरातील विविध भागातील नाल्यांचे पाणी (Drainage water) थेट नदीत मिसळत असल्याने नंदिनी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. तसेच उंटवाडी परिसरातील (Untwadi area) नागरिक तसेच रस्त्यावर येणारे-जाणारे नागरिक या नदीत कचरा फेकत असल्याने नदीच्या आजूबाजूला पूर्ण कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी नागरिकांनी कचरा नदीत टाकू नये, यासाठी मनपातर्फे लाखो रुपये खर्च करून संरक्षण जाळ्या देखील बसवल्या आहेत. नदीपात्रात बर्‍याच ठिकाणी थेट ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने प्रशासनाचा बेजबाबदारपणा यामुळे दिसून येत आहे. पण यामुळे नदीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नदीच्या सीमारेषा ओलांडत अतिक्रमणही (Encroachment) झाले आहे. अतिक्रमणामुळे नदीपात्र छोटे होत चालले आहे. नदीच्या किनारी परिसरात नागरी वस्ती उभी राहिल्याने येथील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. पाण्याबरोबर कचरा टाकला जात असल्याने नदीला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नंदिनी नदीला अनेक पावसाळी नाले जोडले गेले आहे पावसाळ्यातील पाणी (Rainy water) नदीतून वाहून जाणे हा याचा मुख्य उद्देश असताना पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे आणि याच नाल्यातून हे पाणी थेट नंदिनी नदीतून वाहत आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीतून केमिकलयुक्त पाणी (Chemical water) नंदिनी नदीपात्रात सोडले जात आहे. नदीतून काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याने हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. नंदिनी नदी किनारी तत्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com