आहुर्ली | Ahurli
मेहनत, जिद्द, प्रशिक्षण व आधुनिक पद्धतीने नियोजन बद्ध केलेले कोणतेही काम वाया जात नाही. हात पाय गाळुन बसण्याऐवजी अविश्रांत श्रम केले तर फळ नक्कीच मिळते, असा धडा गणेशगाव ता.त्रंबकेश्वर येथील युवा शेतकऱ्याने घालुन देत शेतकऱ्यांपुढे एक आदर्श उभा केला आहे.
सुयोग्य मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने अनुष्का मिरचीची लागवड करत या शेतकऱ्यांने अल्प क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याची किमया करुन दाखवली आहे. गणेशगाव ता. त्र्यंबकेश्वर येथील ज्ञानेश्वर कोरडे नावाच्या युवकाची ही यशोगाथा प्रेरणादायी अशीच आहे.
संपुर्ण जगभर कोरोना महामारीने उच्छाद मांडला असुन, या काळात सर्वच उदयोग व्यवसाय डबघाईस आले आहेत. याचा फटका शेतीलाही बसला असुन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. करोनाच्या संकटात शेतकरी सापडला असतानाही त्या बिकट परिस्थितीचाही सामना करूूून गणेशगाव येथील युवा शेेेतकऱ्याने अभिनव पद्धतीने शेती करत एक आदर्श शेतकऱ्यांपुढे उभा केला आहे.
उत्तम वाणाची निवड, योग्य व अचुक मार्गदर्शन, अपरिमित श्रम व सुयोग्य बाजार विक्री व्यवस्थापन याचे बळावर अल्प क्षेत्रात लाखोची कमाई करण्याची किमया कोरडे यांनी केली आहे. नेत्रा सिड्सच्या संकरीत अनुष्का वाण या मिरचीच्या वाणाची लागवड कोरडे यांनी आपल्या अवघ्या तेरा गुंठे क्षेत्रात करुन भरघोस उत्पन्नाची कमाल केली आहे.
सातपूर, गिरणारे येथील हॉटेल व्यवसायिक त्यांची मिरची घेतात. पस्तीस रुपये प्रती किलो प्रमाणे ३९० ते ४३० रुपये कॅरेटप्रमाणे त्यांच्या मिरचीला बाजारभाव मिळत आहे.
पांरपारिक पद्धतीने शेती आता कालबाह्य झाली आहे. शेतीकडे उद्योग म्हणुनच पहायला हवे. योग्य नियोजन, कठोर परिश्रम याचे बळावर शेती यशस्वी केली जाऊ शकते.
- किरण मांडे, नेत्रा सिडस् , नाशिक
कठोर जिद्द व परिश्रम कधीही वाया जात नाही. मन लावुन काम केले कि ते यशस्वीच होते. फक्त योग्य ते व्यवस्थापन गरजेचे आहे. आजमितीला क्षेत्र कमी व गरजा वाढत असल्याने कमी क्षेत्रात जास्त नफा देणारे प्रयोग करायला हवे. काळी आई निराश करत नाही, फक्त तिची योग्य सेवा करायला हवी.
- ज्ञानेश्वर कोरडे, प्रगतशील शेतकरी गणेशगाव, ता. त्र्यंबकेश्वर