<p><strong>नाशिक । प्रतिनिधी Nashik</strong></p><p>प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथम दर्शनी होते ती त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याने. नाशिक येथे होत असलेल्या 94व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचेही बोधचिन्ह आणि घोषवाक्य आकर्षक आणि समर्पक असावे ही संपूर्ण नाशिककरांची इच्छा होती. </p>.<p>या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. 56 साहित्यप्रेमींनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवून पाठवले. निवड समितीने कोल्हापूर येथील अनंत गोपाळ खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड केली आहे.</p><p>या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी म. वि. प्र. चे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. जयंत पवार, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, चंद्रकांत दीक्षित, मुक्ता बालिगा, किरण सोनार, प्राध्यापक डॉ. एस. के. शिंदे, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. बोधचिन्हाचे विष्लेषण परीक्षक दत्ता पाटील यांनी सांगितले.</p><p>निवड समितीत वास्तू विशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकार आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील, लेखक प्राजक्त देशमुख यांनी काम पाहिले.</p>