
नाशिक | Nashik
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (Krantiveer Vasantrao Narayanarao Naik) शिक्षण प्रसारक संस्था, संचलित, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल नाशिक येथे आज दि. २७ फेब्रूवारी रोजी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' औचित्यावर काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
अशा उपक्रमातून मराठी भाषेचे वैभव विद्यार्थ्यांच्या शब्दांतून बहरत जावे या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप (Principal Dr. Sanjay Sanap) यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
काव्यवाचन (poetry reading) स्पर्धेचे प्रास्ताविक वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. पौर्णिमा बोडके (Dr. Purnima Bodke) यांनी केले, प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतिने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात, ग्रंथ दिंडी, सांस्कृतिक सादरिकरण, काव्यवाचन अशा प्रयत्नांतून आपली भाषिक संस्कृती (Culture) विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो, सांस्कृतिक परंपरा, साहित्य, संस्कृतीच्या जडणघडणीत कुसुमाग्रज यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
त्यामुळे २७ फेब्रूवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून आपण साजरा करत असतो, असे सांगत डॉ. बोडके यांनी आजच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेचे महत्व विषद केले. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गुणगौरव कार्यक्रमात पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप हे होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मराठी भाषेचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक वारसा ; तसेच महत्व अधोरेखित केले, यावेळी प्राचार्य डॉ. सानप म्हणाले, मराठीला आज कुठलाही धोका नाही, १३ कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यात जी भाषा शेकडो वर्षे जतन केली जाते, तेव्हा त्या भाषेची शाश्वसता आपोआपच सिद्ध होते.
कोणत्याही भाषेला कोणतेही शासन वाचवत नसते, तीला वाचवतो तो समाज आणि समाजातला वाचकवर्ग, त्यामुळे आज माध्यमं जरी बदलली असली तरी, बदलत्या काळानुसार आपणही तो बदल स्विकारत या आपल्या 'माय मराठीला' समृद्ध केले पाहिजे असा सल्ला प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी यावेळी दिला. नटसम्राट, घाशीराम कोतवाल, कोसला (Natsamrat, Ghashiram Kotwal, Kosala) यांसारख्या अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या मराठी साहित्यकृतीतील अजरार आविश्वाराचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.
या स्पर्धेच्या निमित्ताने सुमारे २५ पेक्षा अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी आणि दहा पेक्षा अधिक प्राध्यापकांनी आपले सादरीकरण केले. दरम्यान, स्पर्धेचे पंच म्हणून प्रा. शितल आव्हाड (Prof. Shital Ahavad), प्रा. सुनिता बेडसे यांनी जबाबदारी पार पाडली, मराठी विभागाने संयोजन केले होते तर, मराठी विभागप्रमुख डॉ. पौर्णिमा बोडके यांनी संयोजनासाठी मार्गदर्शन केले. सुत्रसंचन प्रा. सीमा केदार यांनी, तर आभार प्रा. संदीप पगारे यांनी व्यक्त केले.
यावेळी, डॉ. मेघा भामरे, डॉ. रुपाली सानप, डॉ. राजेंद्र झोळेकर, प्रा. हाथे, प्रा. नंदादेवी बोरसे, प्रा. संध्या सोनकांबळे, प्रा. मोनाली धांडे, डॉ. चंद्रशेखर घुगे, प्रा. सुरेखा नागरे, प्रा. अमोल बच्छाव यांच्यासह, महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी (Administrative staff) तसेच, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.